राष्ट्रीय श्रमिक आघाडी कामगार संघटनेच्या वतीने धानोरेत धरणे आंदोलन

308

कामगारांना न्याय मिळे पर्यंत आंदोलन सुरु ठेवणार : भोसले
आळंदी (अर्जुन मेदनकर ) : येथील मरकळ रस्त्यावरील धानोरे तील राठी ट्रान्सपॉवर आणि पॉलिबॉण्ड इंडिया प्रा.ली या कंपनीतील कामगारांना कोरोना काळात असलेल्या निर्देशांचे पालन न करता बेकायदेशीर रित्या कामावरून कमी करण्यात आले. या प्रकरणी राष्ट्रीय श्रमिक आघाडी या कामगार हितासाठी कार्यरत कामगार संघटनेच्या वतीने कामगार नेते संघटनेचे अध्यक्ष यशवंतराव भोसले यांचे नेतृत्वात कंपनीच्या समोर बेमुदत धरणे आंदोलन घोषणा देत सुरु करण्यात आले.
या धरणे आंदोलनात संघटनेचे सभासद राठी ट्रान्सपॉवर प्रा.ली. धानोरे आणि पॉलिबॉण्ड इंडिया प्रा.ली सणसवाडी येथील बडतर्फे १०० कामगारांसह सुमारे १५० वर कामगार सभासद, संघटनेचे पदाधिकारी यांनी बेमुदत धरणे आंदोलनात सहभागी होत घोषणा देत आंदोलन सुरु केले. धरणे आंदोलनास आळंदी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून शांतता सुव्यवस्था कायम रहावी यासाठी आळंदी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांचे मार्गदर्शनात बंदोबस्त लावण्यात आला आहे.
या आंदोलना संदर्भात संघटनेचे अध्यक्ष कामगार नेते यशवंत भोसले यांनी माहिती देत कामगारां वरील अन्याय सहन केला जाणार नसल्याचे सांगितले. कामगारांच्या न्याय हक्कासाठी कामगार संघटनेने धरणे आंदोलन सुरु केले असून जो पर्यंत कामगारांच्या न्याय्य मागण्या मान्य होत नाही तो पर्यंत धरणे आंदोलन सुरु रहाणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.
राठी ट्रान्सपॉवर इंडिया प्रा.ली धानोरे आणि पॉलिबॉण्ड इंडिया प्रा.ली सणसवाडी या कंपन्यांतील व्यवस्थापनाने कोरणा काळातील शासनाच्या मार्गदर्शक सूचना आदेश नियमांचे उल्लंघन करून सुमारे शंभर कामगारांना कामावरून कमी केले. तसेच कोरणा कालावधीतील वेतन कपात केले. यामुळे कामगारांच्या न्याय्य हक्कासाठी कामगार संघटनेच्या वतीने व्यवस्थापनाच्या विरोधात उच्च न्यायालयात दावा दाखल करण्यात आला. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून पुरावे तपासून दाव्यात आदेश देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. यात मनाई केलेल्या कामगारांना परत कामावर घेऊन कपात केलेले वेतन द्यावे असे निर्देश अप्पर कामगार आयुक्त यांनी दिले उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार हा निकाल देण्यात आला होता. मात्र व्यवस्थापनाने त्याची अंमलबजावणी केली नाही उलट व्यवस्थापनाने सूडबुद्धीने खोटे आरोप लावून ७० कामगारांवर निलंबनाची कारवाई करून बडतर्फ केले. यामुळे उच्च न्यायालयात अपील दाखल करण्यात आले. यावर निर्णय प्रलंबित असताना राठी ट्रान्सपॉवर आणि पॉलिबॉण्ड इंडिया प्रा.ली या दोन्ही कारखान्यांनी कामगारावर खोटे आरोप लावून दोन्ही कारखान्यातील शंभर कामगारांना निलंबित बडतर्फ केले. त्यामुळे कामगार व कुटुंबीय यांच्यात असंतोषाचे वातावरण व भविष्यातील रोजगार गेलेने आयुष्य उध्वस्त झालेल्या कामगारांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. या दोन्ही कंपनीतील कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी तसेच दिलेल्या आदेशावर अंमलबजावणी व्हावी यासाठी धानोरे येथील राठी ट्रान्सपॉवर, पॉलिबॉण्ड इंडिया प्रा.ली कंपनीच्या गेट समोर बेमुदत धरणे आंदोलन बुधवार (दि.१८) पासून सुरु करण्यात आले आहे. हे धरणे आंदोलन शांतता व कायदा सुव्यवस्था राखून कामगारांच्या हितासाठी धरणे आंदोलन केले जात असल्याचे त्यांनी सांगितले
कामगार नेते भोसले म्हणाले, कामगारांच्या न्यायासाठी आंदोलन करणे हे संघटनेचे कर्तव्य असून त्याप्रमाणे सनदशीर मार्गाने आंदोलन सुरू करत आहे. कामगारांच्या कायदेशीर मागण्या पूर्ण कराव्यात कामगारांची उपासमार थांबावी. यासाठी कंपनी व्यवस्थापनाला पत्र देऊन युनियन केली आहे. या कारणावरून सूडबुद्धीने कामावरून काढलेल्या कामगारांना व त्यांच्या प्रतिनिधी यांना पूर्ववत कामावर घ्यावे. तसेच मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार अप्पर कामगार आयुक्त पुणे यांनी दिलेल्या निर्णयाची अंमलबजावणी व्हावी आणि सूडबुद्धीने खोटे आरोप व स्वतःच्या चौकशी अधिकारी लावून बडतर्फ केलेल्या राठी ट्रान्सपॉवर आणि पॉलिबॉण्ड इंडिया प्रा.ली धानोरे व सणसवाडी येथील कामगारांना कामावरून काढून टाकण्यात आले आहे. त्या सर्व कामगारांना पुन्हा पूर्ववत कामावर घ्यावे. याशिवाय सणसवाडी येथील इतर कामगारां प्रमाणे समान काम, समान वेतन या कायद्या नुसार मागील फरक आणि वेतन, मागील दोन मागणी पत्र दिली असून त्यातील प्रलंबित मागण्या आहेत त्यावर चर्चा करून करार करण्यात यावा. या मागण्या कामगारांच्या न्याय हिताच्या असून जो पर्यंत मागण्या मान्य होत नाही,तो पर्यंत बेमुदत धरणे आंदोलन सुरू रहाणार असल्याचे यावेळी कामगार नेते यशवंत भोसले यांनी सांगितले. यावेळी भारत माता कि जय, वंदे मातरम, हम सब एक है, कामगार एक जातीचा विजय असो अशा जोरदार घोषणा देत बेमुदत आंदोलनास कामगारनेते यशवंतराव भोसले यांचे नेतृत्वात सुरुवात करण्यात आली.
पत्रकार परिषदेत कामगारनेते भोसले म्हणले, कंपनी व्यवस्थापनाने कायम कामगारांना कामावरून कमी केले. कोविड काळात अनेक उद्योजकांनी कामगारांना वाऱ्यावर सोडले, श्रम मंत्रालय, जिल्हाधिकारी, कामगार आयुक्त यांचे कामगारांना कामावरून काढू नयेत असे असताना जिल्हाधिकारी यांचे आदेशाला केराची टोपली दाखवली. धानोरेतील राठी ट्रान्सपॉवर आणि पॉलिबॉण्ड इंडिया प्रा.ली कंपनी येथील ७० ते ७२ कर्मचारी यांना राजीनामा देण्यास भाग पाडले. माझे कडे आल्यामुळे परत व्यवस्थापनाने अनेक कामगारांना कामावरून काढून टाकले. पुणे जिल्हाधिकारी यांचे कडे कामगारांना कामावर घेण्यासाठी पाठपुरावा देखील करण्यात आला. धानोरे आणि सणसवाडी येथील कामगार कमी केल्याने उच्च न्यायालयात दावा दाखल केला. जिल्हाधिकारी यांचे आदेशावर कार्यवाही न केल्याने दावा दाखल केला आहे.
या संदर्भात कंपनी व्यवस्थापनाने दिलेल्या प्रतिक्रियेत ते म्हणाले, कंपनी समोर धरणे आंदोलन सुरु केले आहे. ते न्यायालयीन प्रक्रिया चालू असताना केलेले आंदोलन आहे. या आंदोलनाची माहिती पोलीस प्रशासन कडून एक दिवस आदी मिळाली आहे. संबंधित युनियनची केस मुंबई उच्च न्यायालयात सुरु आहे. त्यामुळे आपण सर्वानी मे. न्यायालयाच्या निर्णयाची वाट पाहावी. तसे औद्योगिक शांतता कायम राखण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन व्यवस्थापनाने केले आहे. येथील ४० स्टाफ या आंदोलनात सहभागी झाले आहेत. कोर्टाचा आदेश आल्यास त्या प्रमाणे कामकाज होईल. कामगार यांना कोविड काळातील सर्व लाभ व वेतन वेळोवेळी दिले असल्याचा दावा व्यवस्थापनाने केला आहे.