भाजपच्या फसव्या योजनांना बळी पडू नका ; होऊ दे चर्चेतून भांडाफोड करणार -शिवसेनानेते भास्कर जाधव

232

कोंढवा प्रतिनीधी,

 ः केंद्र व राज्यातील भाजप सरकारने अनेक योजनांचा भडीमार केला. त्या फसव्या योजनांचा भांडाफोड करण्यासाठी शिवसेनेने होऊ दे चर्चा हा उपक्रम हाती घेतला आहे. या माध्यमातून ही चर्चा रस्तोरस्ती, गल्लोगल्ली, पानपट्टीच्या दुकानात, घराघरातील मतदारापर्यंत पोहोचविण्याचे काम शिवसैनिकांनी करावे, असे आवाहन शिवसेनेचे नेते भास्कर जाधव यांनी केले.

हडपसर विधानसभा मतदारसंघामध्ये कोंढव्यामध्ये शिवसेनेच्या (उबाठा) वतीने होऊ दे चर्चा मेळाव्याचे आयोजन माजी आमदार महादेव बाबर, युवासेना नेते प्रसाद बाबर यांनी केले होते. याप्रसंगी माजी आमदार चंद्रकांत कोकाटे, रघुनाथ कुचीकर, कल्पना थोरवे, बाळासाहेब ओसवाल, समीर तुपे, विजय देशमुख, तानाजी लोणकर, भरत चौधरी, राजेंद्र बाबर, मेघा बाबर, संगीता ठोसर, प्राची आल्हाट आदींसह परिसरातील शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भास्कर जाधव म्हणाले की, लोकशाही व घटना संपविण्याचे काम केले जात असून, संविधानाला आवाहन देण्याचे काम सध्या सुरु आहे. अदानी व अंबानी यांना अच्छे दिन आणले. सर्वसामान्यांना न्याय नाही. महिलांना मणिपूरमध्ये विवस्ञ केले साधी चौकशी केली नाही, ही बाब निंदनीय आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

सुषामा अंधारे म्हणाल्या की, महागाईचा भस्मासूर, नोकरी नाही, व्यवसाय नाही, बेकारी वाढली यावर कोणीही प्रश्न विचारलाच तर देशद्रोही ठरविण्यात येते. जाती-जातीमध्ये तेढ निर्माण केली जात आहे, नोटबंदीमध्ये सामान्य जनता होरपळली. हिंदुत्ववादी सरकार असताना हिंदू खतरे मे कसा काय, सत्तेत नसताना देवेंद्र फडणवीस म्हणायचे की, आमचे सरकार आले तर, तत्काळ मार्ग काढू. मात्र, सत्तेत आल्यावर तो केंद्राचा विषय असल्याचे सांगून जबाबदारी झटकली. भाजपचे देशात ३०० खासदार असून प्रश्न सोडवायला काय अडचण आहे? गुणरत्न सदावर्ते याने मराठा आरक्षणाला कायम विरोध केला. त्याने मराठा आरक्षणाचा प्रश्न भिजत ठेवण्याचे काम भाजपने केले आहे. मातोश्रीवर समान नागरी कायद्याच्या चर्चेसाठी नीलम गोऱ्हे थांबल्या नाहीत. त्यांनी केवळ खुर्ची वाचविण्यासाठी पक्ष बदलला. आनंदाचा शिधामध्ये येणारे साहित्य हे जनावरे खाणार नाहीत असे निकृष्ट दर्जाचे साहित्य वाटले जाते. शेत पिकत नाही म्हणून बाप अन् नोकरी लागत नाही म्हणून पोरगं आत्महत्या करत आहे, याचा जाब भाजप सरकारला विचारण्याची वेळ आल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, शिवसेनेचे संपर्कप्रमुख सचिन आहेर, शिवसेना युवानेते शरद कोळी यांनीही मार्गदर्शन केले.