सर्वांच्‍या सहकार्याने निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडेल- जिल्‍हाधिकारी राम

897

अनिल चौधरी,पुणे

आगामी लोकसभा निवडणुकीच्‍या दृष्टिने सर्व समन्वय अधिका-यांनी ( नोडल ऑफीसर्स) योग्‍य ती पूर्वतयारी केल्‍याबद्दल जिल्‍हाधिकारी तथा जिल्‍हा निवडणूक अधिकारी नवल किशोर राम यांनी समाधान व्‍यक्‍त केले असून सर्वांच्‍या सहकार्याने निवडणूक प्रक्रिया शांततेत आणि सुरळीत पार पाडली जाईल, असा विश्‍वास व्‍यक्‍त केला.

जिल्‍हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी मावळ लोकसभा मतदार संघाच्‍या निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी, बारामती लोकसभा मतदार संघाचे सुभाष डुंबरे, शिरुर लोकसभा मतदार संघाचे रमेश काळे,उपजिल्‍हा निवडणूक अधिकारी मोनिका सिंह, निवासी उप जिल्‍हाधिकारी डॉ. जयश्री कटारे यांच्‍यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

जिल्‍हाधिकारी श्री. राम यांनी प्रारंभी समन्‍वय अधिका-यांकडून त्‍यांच्‍यावर सोपवण्‍यात आलेल्‍या जबाबदारीची आणि त्‍यांनी केलेल्‍या पूर्वतयारीची माहिती घेतली. निवडणूक प्रक्रियेत प्रत्येक घटकाची जबाबदारी महत्‍त्‍वाची असल्‍याचे त्‍यांनी सांगितले. मतदार जागृतीसाठी (स्‍वीप कार्यक्रम) विविध सामाजिक व स्‍वयंसेवी संस्‍थांची मदत घेण्‍यात येणार असून पथनाट्ये, पोस्‍टर्स, वैयक्तिक भेटी, कलापथक अशा विविध साधनांचा वापर केला जाणार आहे. वृत्‍तपत्रे, रेडिओ,दूरचित्रवाणी, तसेच सोशल मिडीयाद्वारेही जनजागृती केली जाणार आहे.

बैठकीत मतदान केंद्रे, मतदान केंद्रावरील मुलभूत सुविधा,( रॅम्‍प, वीज, पाणी, प्रसाधनगृहे), दिव्‍यांग मतदार याबाबत माहिती घेण्‍यात आली.