पाण्यासाठी नागरिकांचा टाहो; नगरसेवक बाबर यांचा सूचक इशारा

1166

कोंढवा प्रतिनिधी

गेली दोन महिने कोंढवा भागातील शिवनेरी नगर, मिठानगर, भाग्योदय नगर मध्ये पाण्याच्या अनियमित पाण्याच्या पार्श्वभूमीवर या भागामधील नागरिकांनी आज नगरसेवक साईनाथ बाबर यांच्या कार्यालयात जमून पाण्याची मागणी केली.लगेच बाबर यांनी पाणी पुरवठा विभागाचे मुख्य अधिकारी कुलकर्णी यांना त्यांच्या कार्यालयात बोलावून घेऊन येत्या चार दिवसात पाणी पुरवठा सुरळीत करण्याची सक्त ताकीद दिली .

शिवनेरीनगर,मिठानगर, भाग्योदयनगर भागामध्ये पाणी अत्यंत कमी प्रमाणात तर काही ठिकाणी अजिबात पाणी येत नाही. त्यामुळे नागरिक अत्यंत संतप्त झाले होते. नगरसेवक साईनाथ बाबर यांनी अनेकवेळा पाणी पुरवठा अधिकाऱ्यांना वेळोवेळी पाणी सुरळीत करण्यास सांगितले होते. पण गेंड्याची कातडी असलेले अधिकारी याकडे दुर्लक्ष करत होते. त्यामुळे ज्या भागामध्ये पाणी येत नव्हते त्या भागामध्ये नगरसेवक बाबर टँकरने पाणी पुरवठा करत होते. पण पाणी कमी पडत होते. आज सकाळी संतप्त नागरिकांनी नगरसेवक बाबर यांचे कार्यालय गाठून पाणी देण्याची मागणी केली. त्यांनीं त्वरित पाणी पुरवठाचे मुख्य अधिकाऱ्यांना आपल्या कार्यालयात बोलावून घरून वस्तुस्थितीची जाणीव करून दिली. तसेच येत्या चार दिवसात या भागातील पाणी पुरवठा सुरळीत आणि मोठ्या प्रमाणात नाही झाला तर चार दिवसांनंतर अधिकाऱ्यांच्या घरावर मोर्चा आणि मनसे स्टाईलने आंदोलन करण्यात येईल असा इशाराच त्यांनी दिला. यावर अधिकाऱ्यांनी येत्या चार ते पाच दिवसात पाणी पुरवठा सुरळीत करू असे आश्वासन दिले.
याप्रसंगी हुसेनभाई शेख, सतीश शिंदे, रोहित सोनावणे, मुनिर शेख, अमोल शिरस, हुसेन शेख, रेश्मा पंजाबी , शबाना शेख, नजमा बागवान, शायदा शेख, सुमैया पंजाबी तसेच कोंढवा खुर्द, शिवनेरी नगर, मिठा नगर, भाग्योदयनगर भागातील नागरिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.