कोंढवा परिसरात पाण्यासाठी नागरिकांचा टाहो; पाणीपुरवठ्याचे मुख्य अधिकारी यांना नागरिकांनी घातला घेराव

705

मल्हार न्यूज प्रतिनिधी,
कोंढवा परिसरात गेल्या तीन चार महिन्यापासून शिवनेरी नगर, मिठा नगर, भाग्योदय नगर, साईबाबा नगर विभागा मधील संतप्त महिला व नागरिकांनी सोमवार दि.1 एप्रिल रोजी सकाळी 11.00 सुमारास स्थानिक मनसे नगरसेवक साईनाथ बाबर यांच्या कार्यालयात एकत्र जमून पाण्याची मागणी केली. नगरसेवक साईनाथ बाबर यांनी त्वरित पाणी पुरवठा विभागाचे मुख्य अधिकारी यांना कार्यालयमध्ये बोलून घेऊन पाण्याच्या संकटाची माहिती दिली. यावेळी कोंढव्यातील संतप्त महिलांनी व नागरिकांनी पाणीपुरवठा मुख्य अधिकाऱ्यांना घेराव घालत पाणी प्रश्नी जाब विचारला.

कोंढवा परिसरात ऐन उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. शिवनेरी नगर, मिठा नगर, भाग्योदय नगर, साईबाबा नगर विभागात तीन चार महिन्यापासून पाण्याचा ठणठणाट निर्माण झाला आहे. विभागात अनियमितपणे  पाणीपुरवठा होत आहे. कोंढवा विभागातील संतप्त महिलांनी व नागरिकांनी स्थानिक नगरसेवक साईनाथ बाबर यांच्या कार्यालयात एकत्र जमून पाण्याची मागणी केली. वस्तुस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन लागलीस मनसे नगरसेवक साईनाथ बाबर यांनी पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अधिकारी व्ही.जी.कुलकर्णी यांना कार्यालयात बोलावून पाणी टंचाईच्या गंभीर संकटाची माहिती दिली. कोंढवातील संतप्त महिलानी पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता यांना घेराव घालत पाणीपुरवठा सुरळीत पणे चालू कधी होणार आहे याचा जाब विचारला. याबाबत येत्या चार ते पाच दिवसात पाणीपुरवठा सुरळीत होईल असे आश्वासन मनपा पुणे पाणीपुरवठा मुख्य अधिकारी कुलकर्णी यांनी दिल्यानंतर निर्माण झालेला तणाव निवळला. यावेळी स्थानिक मनसे नगरसेवक साईनाथ बाबर यांनी पाणीपुरवठा मुख्या अधिकाऱ्यांनी दिलेले आश्वासन पाळले नाही तर आम्हाला मनसे स्टाईलने आंदोलन करावे लागेल असा सूचक इशारा दिला.

स्थानिक मनसे नगरसेवक साईनाथ बाबर :-
प्रभाग क्र. २७ कोंढवा खुर्द-मिठा नगर भागातील भाग्योदय नगर, शिवनेरी नगर, कोंढवा गावठाण,सर्व्हे नं.४२, ज्ञानेश्वर नगर, मिठा नगर-साईबाबा नगर येथील पाणी पुरवठा सतत विस्कळीत होणे. कमी दाबाने पाणी येणे, वेळी-अवेळी पाणी येणे या सर्व समस्यांना वैतागून आज पुणे म.न.पा.चे पाणी पुरवठ्याचे मुख्य अभियंता श्री व्ही.जी.कुलकर्णी यांना घेराव घालण्यात आला पुढील पाच दिवसात पाणी पुरवठा सुरळीत झाला नाही तर मोठं जनआंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी दिला.

स्थानिक नागरिक अनिल चौधरी :-
कोंढवा परिसरात गेल्या तीन चार महिन्यापासून पाणी पुरवठा पूर्णपणे बंद आहे. नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. उन्हाळ्यात 40 डिग्री सेल्सिअस तापमानात अंगाची लाही-लाही होत असताना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहेत. पाण्याअभावी विना अंघोळीचे राहण्याची वेळ नागरिकांवर आली आहे कोंढव्यात इतके दिवस पाणी नाही आपण काय करत आहात. असा संतप्त सवाल उपस्थित करीत सुरळीत पाणी पुरवठ्याची मागणी केली.

पुणे मनपा पाणीपुरवठा मुख्य अधिकारी व्ही.जी.कुलकर्णी :-
उन्हाळ्याची सुरुवात झाल्याने पाण्याच्या मागणीत वाढ झाली आहे. त्यामुळे पाणीपुरवठा करत असताना अडचण निर्माण होत आहे. पाणी कपाती केल्यानंतर पाणी पूर्ववत करताना कोंढवा परिसर हा चढ-उताराचा असल्याने पाणीपुरवठ्याची पूर्तता करताना अडचण निर्माण होत आहे. कोंढव्यातील अनियमित पाणी प्रश्नी सर्व संलग्न अधिकाऱ्यांची बैठक बोलावून लवकरच योग्य तो निर्णय घेतला जाईल असे सांगण्यात आले.