३ मे पासून ‘बाळा’ चित्रपटगृहात

612

मल्हार न्यूज प्रतिनिधी,

खेळात करियर घडवता येत नाही असा समज असणारे अनेक पालक आजही आपल्या अवतीभोवती दिसतात. आपल्या मुलांची खेळाची आवड लक्षात न घेता केवळ त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेसाठी आग्रही असणारे पालक आपल्याच पाल्याचीकारकिर्द धोक्यात आणतात. अशाच एका मुलाची कथा सांगणारा ‘बाळा’ हा मराठी चित्रपट ३ मे ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘यश अँड राज एंटरटेंन्मेट’ या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती निर्माते राकेश सिंग यांनी केली असून सचिंद्र शर्मा यांनी या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन केले आहे.

बाळा या मुलाच्या क्रिकेटवेडाची, त्याच्या ध्यासाची कथा ‘बाळा’ या चित्रपटातून पहायला मिळणार आहे. क्रिकेट प्रेमापायी बाळा घर सोडून पळून जातो. त्याच्या क्रिकेट खेळाला विरोध करणारे पोलीस इन्स्पेक्टर असलेले बाळाचे वडील त्याचा शोध लावू शकत नाहीत. दुसरीकडे बाळा त्याचं स्वप्न पूर्ण करतो का ? व त्यासाठी त्याला कोणाकोणाची मदत मिळते ? हे दाखवतानाच बाळाचा घरापासून ते क्रिकेट संघामध्ये स्थान मिळवण्यापर्यंतचा संघर्ष चित्रपटात मांडण्यात आला आहे.क्रिकेटवेड्या बाळाच्या निर्धाराची, स्वप्नांची गोष्ट उलगडून दाखवतानाच प्रत्येक मुलामध्ये एक जन्मजात क्षमता असते. फक्त त्या क्षमतेचा योग्य वापर होणं गरजेचं असतं हे सांगण्याचा प्रयत्न ‘बाळा’ या चित्रपटामध्ये करण्यात आला आहे.

उपेंद्र लिमये, क्रांती रेडकर, विक्रम गोखले, सुहासिनी मुळ्ये, कमलेश सावंत या मातब्बर कलाकारांसोबत मिहीरीश जोशी हा नवा चेहरा तसेच यशवर्धन–राजवर्धन, आशिष गोखले, ज्योती तायडे, अपेक्षा देशमुख, हिया सिंग हे सहकलाकार या चित्रपटात दिसणार आहेत. भारतीय संघाचे माजी कर्णधार, ज्येष्ठ क्रिकेटपटू अजित वाडेकर क्रिकेट प्रशिक्षकाच्या विशेष भूमिकेत दिसणार आहेत.

‘बाळा’ या चित्रपटाची निर्मिती करणारे राकेश सिंग यांनी याआधी भोजपूरी चित्रपट तसेच अनेक लघुपटांची निर्मिती केली आहे. दिग्दर्शक सचिंद्र शर्मा यांनीसुद्धा ‘माय फ्रेंड गणेशा’ याच्या चार सिरीजचे लेखन-दिग्दर्शन तसेच ‘भूत अंकल’, ‘भूत एज फ्रेंड’, ‘मैं कृष्णा हूँ’ या सारख्या अनेक लोकप्रिय बालचित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. ‘बाळा’ चित्रपटाच्या निमित्ताने या दोघांनी मराठीत पदार्पण केले आहे.

सोनू निगम, आदर्श शिंदे, रोहित राऊत, निहार शेंबेकर, उर्मिला धनगर या गायकांचा स्वरसाज चित्रपटातील गाण्यांना लाभला आहे. विजय गमरे यांनी लिहिलेल्या गीतांना महेश-राकेश यांनी संगीत दिले आहे. छायांकन आर.आर प्रिन्स तर संकलन अभिजीत कुंदार यांचे आहे. नृत्यदिग्दर्शन विष्णू देवा, हबीबा रेहमान, फुलवा खामकर यांनी केले आहे. वेशभूषा चैत्राली डोंगरे यांची आहे.