कुर्ला अंधेरी ट्राफिक समस्येबाबत सामाजिक कार्यकर्ते “संजय तिवारी” यांनी जनआंदोलनाचा इशारा देताच,(एल विभाग )सहाय्यक आयुक्त नरमले

694

गणेश जाधव, प्रतिनिधी

कोरोनाच्या काळात देखील मुंबईकरांना ट्रॅफिकच्या समस्येला जिकरीने तोंड द्यावे लागत आहे.मुंबईकरांच्या रोजच्याच जीवनातला पोटतिडकीचा विषय म्हणजे ट्राफिक आणि याच ट्राफिक समस्येबाबत काही दिवसांपूर्वी सामाजिक कार्यकर्त्यांनी,काही संघटनांनी एल विभाग, सहाय्यक आयुक्त” मनीष वळंजू “यांच्या दालनात जनउपोषणाचा इशारा दिला होता. याच जनउपोषणाचा धसका घेत प्रशासनाने तातडीची संबंधित अधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते ,सामाजिक संघटना यांची संयुक्त बैठक एल विभाग ,सहाय्यक आयुक्त यांच्या दालनात आयोजित केली.

सदर बैठकीत कुर्ला अंधेरी मार्ग रस्त्यावर होत असलेल्या ट्रॅफिक समस्याचे निवारण करण्यासाठी एल विभाग ,सहाय्यक आयुक्त “मनीष वळंजू” यांनी सामाजिक कार्यकर्ते संजय तिवारी ,सब्बन अली, सिकंदर शेख ,महेंद्र भानुशाली ,विकास शेळके, सुदाम साहिल ,जय हिंद फाऊंडेशन व इतर मान्यवरांशी चर्चा केली.यावेळी सदर बैठकीत उपस्थित मान्यवरांनी ट्रॅफिक समस्येबाबत प्रमुख मागण्या शासन दरबारी मांडल्या त्याखालील प्रमाणे:-

१) कमानी राईट टर्न (वळण) लेफ्ट टर्न बंद करून मगन नथुराम गोडसे रस्त्यावरील सर्व वाहतूक पूर्ववत करण्यात यावी.
२)कब्रस्तान ते जरीमरी माता मंदिर पर्यंत तात्पुरते डिव्हायडर टाकण्यात यावे.
३) कमानी ते साकीनाका (कुर्ला अंधेरी मार्ग) रस्त्यावरील डेड व्हेईकल व अनाधिकृत पार्किंग वाहन हटवण्यात यावे.
४) साकीनाका पासुन ते एमटीएनएल एअरपोर्ट राईट टर्न(वळण )बंद करण्यात यावा.
५) कुर्ला अंधेरी मार्ग रस्त्यावरील दुकानदारांचे दुकानाबाहेरील अनाधिकृत अतिक्रमण हटविण्यात यावे.
६) फूटपाथ वरील अनाधिकृत फेरीवाल्यांचे अतिक्रमण हटविण्यात यावे.

या बैठकीत प्रशासनाकडून एल विभाग सहाय्यक आयुक्त मनीष वळंजू, सहाय्यक अभियंता (परीक्षण) आर. एच दवेकर , सहाय्यक अभियंता (परीक्षण )नितीन पावडे, अतिक्रमण निर्मूलन विभागाचे (वरिष्ठ निरीक्षक) वसंत विरकर, कुर्ला व साकीनाका वाहतूक विभागाचे प्रभारी (वाहतूक पोलीस निरीक्षक) दीपक ढोके (कुर्ला विभाग), जयवंत संकपाळ (साकीनाका विभाग) उपस्थित होते. ट्रॅफिक समस्येबाबत संबंधित अधिकारी आणि उपस्थित मान्यवरांनी चर्चा करून लवकरात लवकर योग्य त्या उपाययोजना करण्यात याव्यात अशी विनंती करण्यात आली.

“ट्रॅफिक समस्येचा नाहक त्रास स्थानिक जनतेने का आणि किती वर्ष सहन करायचा ?”असा प्रश्न सामाजिक कार्यकर्ते “संजय तिवारी “यांनी सहाय्यक आयुक्तांना पुढे उपस्थित केला. ट्रॅफिक समस्येबाबत सहाय्यक आयुक्तांनी संबंधित वाहतूक पोलीस निरीक्षकांना तसेच अतिक्रमण निर्मूलन विभागाचे अधिकारी यांना योग्य त्या सूचना देत लवकरात लवकर स्थानिकांचा प्रश्न मार्गी लावावा असे सुचित केले.

या संयुक्त बैठकीतून प्रशासनाकडून सकारात्मक निर्णय प्राप्त झाल्यामुळे नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले तसेच “स्थानिक जनतेला ट्रॅफिक समस्येतून काहीसा दिलासा मिळेल “असे मत सामाजिक कार्यकर्ते ” संजय तिवारी “यांनी देखील व्यक्त केले.