ठाण्यात रंगणार महाराष्ट्र सेलिब्रिटी क्रिकेट लिग

1064

अनिल चौधरी,

ठाणे, दि. १९  प्रतिनिधी – मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक सितारे १, २ आणि ३ फेब्रुवारी रोजी ठाण्यात क्रिकेट खेळताना दिसणार आहेत. निमित्त आहे ‘महाराष्ट्र सेलेब्रिटी क्रिकेट लिग’ या स्पर्धेचे. ठाणे महानगरपालिकेच्या वतीने नूतनीकरण करण्यात आलेल्या दादोजी कोंडदेव स्टेडियमचे उद्घाटन या स्पर्धेने होणार असल्याची माहिती आयोजकांनी पत्रकार परिषदेत दिली. तसेच या प्रसंगी खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात स्पर्धेच्या ट्रॉफी आणि थीमसॉंगचे अनावरण करण्यात आले.

‘महाराष्ट्र सेलेब्रिटी क्रिकेट लिग’ या स्पर्धेचे यंदा पहिलेच वर्ष आहे. स्पर्धेचे आयोजन  ठाणे महापालिका आणि दिग्दर्शक विजू माने, आकाश पेंढारकर, संदीप जुवाटकर यांनी केले असून डी. बी. एन्टरटेन्मेंटचे दिलीप भगत सहआयोजक आहेत. यावेळी खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे, ठाणे मनपा शिक्षण मंडळ सभापती विकास रेपाळे यांच्यासह स्पर्धेत सहभाग घेणाऱ्या सहा संघाचे कर्णधार अनुक्रमे ‘मुंबईचे मावळे’ – संजय जाधव, ‘बाणेदार ठाणे’ – अंकुश चौधरी, ‘कोकणचे वाघ’ – सिद्धार्थ जाधव, ‘खतरनाक मुळशी’ – महेश लिमये, ‘पराक्रमी पुणे’ – सौरभ गोखले आणि ‘लढवय्ये मीडिया’ – विनोद सातव उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे म्हणाले, महापालिकेने नूतनीकरण केलेल्या स्टेडियमचे उद्घाटन या स्पर्धेने होत आहे ही उत्तम बाब आहे, या ठिकाणी भविष्यात स्थानिक खेळाडूंना उच्च दर्जाच्या अत्याधुनिक सोई सुविधा उपलब्ध होतील.

शिक्षण सभापती विकास रेपाळे म्हणाले, महाराष्ट्र सेलेब्रिटी क्रिकेट लिग हा स्तुत्य उपक्रम आहे. ठाण्यात कलारसिकांची मांदियाळी आहे, शहराचे सांस्कृतिक क्षेत्रात मोठे योगदान आहे, यामुळे या स्पर्धेची थीम ठाणेकरांच्या पसंतीस पडेल. विजू माने यांनी आता ठाण्यात आम्हा राजकारण्यांसाठीही अशी स्पर्धा घ्यावी, राजकारणातली आमची फायनल मॅच एप्रिल मध्ये होणार आहे.

अभिनेता अंकुश चौधरी म्हणाला, आम्ही आमच्या कामात कितीही व्यस्त असलो तरी क्रिकेटची ओढ आम्हाला खेळाच्या मैदानात घेउन येते. सिद्धार्थ जाधव म्हणाला, आम्ही आता लढण्यासाठी सज्ज झालो आहोत.

संजय जाधव म्हणाले, विजू माने यांना मी खूप वर्षे बघतोय, त्यांनी शून्यातून आपला प्रवास सुरु केला, त्यांच्यावरील प्रेमापोटी मी इथे आहे.

सौरभ गोखले म्हणाला, मी पुण्याचा असलो तरी दोन्ही शहरांचे क्रिकेट बद्दलचे प्रेम सारखेच आहे.

विनोद सातव म्हणाले, मिडियातील पत्रकार नेहमी पडद्यामागे, कॅमेऱ्याच्या मागे असतात मात्र या स्पर्धेच्या निमित्ताने पहिल्यांदाच आम्ही लोकांसमोर येउन खेळणार आहोत. तर महेश लिमये यांनी मनोगत व्यक्त करत सर्वांना शुभेच्छा दिल्या.

या स्पर्धेचे थीमसॉंग सोहम पाठक यांनी तयार केले असून गीत विजू माने यांचे आहे तर प्रसेनजीत कोसंबी याने गायले आहे. तसेच स्पर्धेसाठी विकास रेपाळे यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिनेत्री दीप्ती देवी हिने केले.

या स्पर्धेत उपेंद्र लिमये, राजेश शृंगारपुरे, संजय नार्वेकर, विनय येडेकर, अतुल परचुरे, हृषीकेश जोशी, प्रथमेश परब, अनिकेत विश्वासराव, प्रविण तरडे, शरद केळकर, समिर धर्माधिकारी, अंगद म्हसकर, माधव देवचक्के, निरंजन नामजोशी, सुनील अभ्यंकर, विजय आंदळकर, अमित भंडारी, अमित फाळके (सोनी मराठी), मंगेश कुलकर्णी (झी स्टुडीओज),  दीपक देऊळकर (संगीत मराठी) बवेश जानवलेकर (झी टॉकीज, झी युवा) विनोद घाटगे (ABPमाझा) कपिल देशपांडे (TV9)  विराज मुळ्ये (NEWS18 लोकमत) यांच्यासह अनेक सेलेब्रिटींचा सहभाग असणार आहे.