डॉ. डी. वाय. पाटील युनिटेक सोसायटीचे डॉ. डी. वाय. पाटील लॉ कॉलेज, पिंपरी मध्ये राष्ट्रीय स्तरावरील पथनाट्य स्पर्धा आणि कार्यशाळा संपन्न
पुणे, प्रतिनिधी – डॉ. डी. वाय. पाटील लॉ कॉलेज, पिंपरी मध्ये दोन दिवसीय राष्ट्रीय स्तरावरील पथनाट्य स्पर्धा आणि कार्यशाळा उत्साहात पार पडली. महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोग,मुंबई व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या सहकार्याने हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. मानवाधिकारांविषयी जागरूकता निर्माण करण्याचा उद्देश असलेल्या या उपक्रमाला विविध महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या दोन दिवसीय कार्यक्रमाच्या उद्घाटन सत्राला महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगाचे सदस्य (सेवानिवृत्त आयपीएस) श्री. संजय कुमार, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कार्यकारी निबंधक प्रा.(डॉ.) ज्योती भाकरे व डी वाय पाटील कला वाणिज्य विज्ञान, पिंपरी चे प्राचार्य उपस्थित होते. समारोप सत्राला राज्य मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती ए. एम. बदर यांच्यासह प्र. कुलगुरू सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ डॉ. पराग काळकर आणि राज्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अतिरिक्त आयुक्त श्री. संदीप दिवाण आदी मान्यवर उपस्थित होते. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी महाराष्ट्र मानव हक्क आयोगाचे निबंधक श्री. विजय केदार आणि डॉ. डी. वाय. पाटील लॉ कॉलेज, पिंपरी चे प्राचार्य, डॉ. एस. एस. गोपाकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजक समितीचे सचिव सहा. प्रा. अर्जुन सोमवंशी, इतर आयोजक समितीचे सदस्य सहा. प्रा. डॉ विजेता चौधरी, सहा. प्रा.समृद्धी शाह, सहा. प्रा. प्रदीप केंद्रे, सहा. प्रा. डॉ. अंजुम अजमेरी,ऍड. विवेक भरगुडे व इतर सर्व शिक्षकांनी विशेष मेहनत घेतली.
पथनाट्याच्या माध्यमातून, विद्यार्थ्यांनी सामाजिक जाणिवा अधोरेखित करणारी आणि समाजात न्याय, समानता व समावेशकतेचे महत्त्व सांगणारी कथानके मोठ्या ताकदीने सादर केली. त्यांनी जटिल कायदेशीर संकल्पना आणि मानवी हक्कांचे महत्त्व आकर्षक आणि थेट संवादातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवून उत्स्फूर्त दाद मिळवली. या स्पर्धेने युवकांना रंगभूमीच्या प्रभावी वापराद्वारे सामाजिक बदलाचे वाहक बनण्याचा संदेश दिला.
या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेची मध्यवर्ती थीम ‘बदलत्या जगात मानवी हक्क: नवीन आव्हानांना तोंड देणे आणि सामायिक जबाबदाऱ्या स्वीकारणे’ ही होती. सहभागी विद्यार्थ्यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्य, लिंग समानता, सामाजिक-आर्थिक हक्क, लोकशाही मूल्ये आणि तंत्रज्ञानामुळे निर्माण होणारी आव्हाने यांसारख्या गंभीर उपविषयांवर आधारित प्रभावी पथनाट्ये सादर केली.



