अण्णाभाऊंच्या साहित्याची १०० किलो वजनाची ग्रंथतुला

526
पुणे : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी निमित्त अण्णाभाऊंनी लिहिलेल्या १०० किलो वजनाच्या पुस्तकांची ग्रंथतुला करण्यात आली. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (रिपाइं) गटनेत्या नगरसेविका सुनीता वाडेकर व ‘रिपाइं’ नेते परशुराम वाडेकर यांच्या वतीने बोपोडीतील प्रभाग क्रमांक आठमधील सम्यक विहारात ही तुला झाली. यावेळी पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलन करून अण्णाभाऊंना अभिवादन करण्यात आले. अण्णाभाऊंना भारतरत्न देण्याची मागणी ‘रिपाइं’च्या परशुराम वाडेकर यांनी केंद्र सरकारकडे केली. 
बारा बलुतेदार, कष्टकऱ्यांच्या, उपेक्षितांच्या समस्यांना आपल्या शाहिरीतून, विपुल लेखनातून अण्णाभाऊनी वाचा फोडली. लोकनाट्य, नाटके, कथासंग्रह, कादंबरी, शाहिरी, प्रवासवर्णन आदी पुस्तकांसह भारताचे संविधान या ग्रंथतुलेत ठेवण्यात आले. ग्रंथतुलेतील ही सर्व पुस्तके उपस्थित मान्यवरांसह सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांना वाटण्यात आली. अण्णाभाऊंच्या साहित्याचे खंड, फकिरा आदी पुस्तकांचा यात समावेश होता. या ग्रंथतुला व अभिवादन सोहळ्याला स्थानिक नगरसेविका सुनिता वाडेकर नगरसेवक प्रकाश ढोरे भाजपा चे शहर उपाध्यक्ष दत्ता खाडे भाजपा शिवाजीनगर अध्यक्ष रविंद्र साळेगावकर, भाजपा महिला अध्यक्षा डॉ.अपर्णा गोसावी, रिपाईं शिवाजीनगर अध्यक्ष अविनाश कदम, निलेश वाघमारे, अतुल आगळे, जोएल अन्थोनी, सचिन चव्हाण, रोहित अडसूळ, दीपक लोखंडे, विशाल कांबळे, निलेश वाघमारे, बाळु मोरे, आण्णा आठवले, सुनिल कांबळे, अजिंक्य गाडे, भिमा गायकवाड, आकाश ढोणे, सामाजिक कार्यकर्ते शहाबुददीन काझी, सादीक शेख, विजय सोनिगरा, नितीन जाधव, आप्पासाहेब वाडेकर, महिला कार्यकर्त्या नंदा निकाळजे, राजश्री कांबळे, कलावती भंडारे व विविध क्षेत्रातील मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते. प्रकाश ढोरे, रवींद्र साळगावकर यांनी मनोगत व्यक्त केले.
परशुराम वाडेकर म्हणाले, “अण्णाभाऊंची जन्मशताब्दी मोठ्या स्वरूपात साजरी करण्याचे नियोजन होते. मात्र कोरोनामुळे हा कार्यक्रम रद्द करावा लागला. आपल्या लेखणीतून समाजाला दिशा देणाऱ्या, उपेक्षितांच्या प्रश्नांवर फुंकर घालणाऱ्या अण्णाभाऊंच्या शंभराव्या जयंतीनिमित्त १०० किलो वजनाच्या त्यांच्या पुस्तकांची ग्रंथतुला करून त्यांना अभिवादन केले. पुढील काळात सम्यक साहित्य संमेलन होणार असून, ते अण्णाभाऊंना समर्पित असणार आहे. तसेच विविध कार्यक्रमांतून अण्णाभाऊंची जन्मशताब्दी साजरी करणार आहोत. आण्णाभाऊ साठेंना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा अशी मागणी आम्ही केंद्र सरकारला करत आहोत.”