Monday, May 12, 2025
Google search engine
Homeताज्या घडामोडीअध्यात्म, वैश्विक तत्त्वज्ञान भारताला विश्वगुरू बनवेल - केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक...

अध्यात्म, वैश्विक तत्त्वज्ञान भारताला विश्वगुरू बनवेल – केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांचे प्रतिपादन

 साधू-संत, महंतांच्या सत्संगाने वातावरण भक्तिमय

पुणे : “आध्यात्म हीच भारताची खरी शक्ती होती. गेल्या काही वर्षांत तिची ओळख पुन्हा जनतेला होत आहे. या शक्तीचे संवर्धन करून देशाला जगात महत्त्वाच्या स्थानी स्थापित करण्याचे स्वप्न साकार केले पाहिजे. अध्यात्म, वैश्विक तत्वज्ञान आणि संत-महात्मात्यांचा शुभाशिर्वाद भारताला विश्वगुरू बनवण्याचे स्वप्न साकार करेल,” असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी केले. साधू-संत, महंतांच्या सान्निध्याने वातावरण अध्यात्मिक व भक्तिमय झाले होते.

महामंडलेश्वर शिवानंद महाराज प्रतिष्ठान व मातोश्री विजयाताई नाईक सामाजिक फाउंडेशनच्या पुढाकारातून महाराष्ट्राच्या इतिहासात पुण्यात पहिल्यांदाच झालेल्या साधू-संत-महंत संमेलन व दर्शन सोहळ्यात श्रीपाद नाईक बोलत होते. वर्धमान सांस्कृतिक भवनमध्ये झालेल्या या संमेलनावेळी हरियाणा येथील महंत श्रीश्रीश्री १००८ कालिदास महाराज, पंचदशनाम जुना आखाड्याचे महामंत्री श्रीश्रीश्री १००८ अशोक महाराज, हरिद्वार येथील महामंडलेश्वर श्रीश्रीश्री १००८ प्रेमगिरी महाराज, श्रीश्रीश्री १००८ हरिगिरी महाराज, किन्नर जुना आखाड्याच्या महामंडलेश्वर श्रीश्रीश्री १००८ दीपाताई राजमाने (जगवाली), महामंडलेश्वर शिवानंद महाराज यांच्यासह अनेक मठाधिपती, नागा साधू, वाचासिद्धी संत, महात्मे उपस्थित होते.

संमेलनात विश्वशांती महायज्ञ, सुमधुर सुंदरकांडाचे प्रस्तुतीकरण, भजन व प्रवचन, मुक्त भांडारा, गोमाता पूजन करण्यात आले. हरिद्वारवरून आणलेल्या एक हजार लीटर गंगाजलमध्ये हा महाप्रसाद तयार करण्यात आला. गुरुवर्य प्रकाशभाऊ शिंदे निर्मित भारतातील एकमेव जागृत अकरा मारुती मठाचा आणि मठाधिपती पदाचा ग्रहण सोहळा झाला. मातोश्री विजयाताई नाईक सामाजिक राष्ट्रीय फाउंडेशनचे लोकार्पण व संकेतस्थळाचे उद्घाटन झाले. संमेलनाच्या यशस्वीतेसाठी अतुल नरहरी भोसले, राहुल गोसावी मित्र परिवार, महामंडलेश्वर शिवानंद महाराज प्रतिष्ठान, सर्वात्मक महारुद्र परिवार, मैत्री प्रतिष्ठान, शिवाजी करंजुले, नंदकिशोर शहाडे, ललित तींडे, भरत मिसाळ, डॉ. इंद्रजित यादव, ऍड. महेंद्र दलालकर, निलेश आवटे, चिमाजी आहेर, पंकज महाले यांनी परिश्रम घेतले.

श्रीपाद नाईक म्हणाले, “छोट्या चुकीमुळे आपला देश पारतंत्र्यात गेला. त्यावेळी देशातील संत समाज आणि आध्यात्मिक शक्तीमुळेच देश पुन्हा उभा राहिला. संतांच्या आशिर्वादांमुळे सत्य आणि नीतीमत्तेच्या मार्गावर चालत राहिलेला हा देश सातत्याने प्रगतिपथावर आहे. संतांच्या भेटीने व्यक्तीचा भाग्योदय होतो. देशाला भविष्यात अग्रस्थानी नेण्यासाठी देखील हीच आध्यात्मिक, धार्मिक शक्ती साहाय्यक ठरेल. साधू-संतांची परंपरा आपण जगली व जागवली पाहिजे. ‘उरलो उपकारापुरता’ हे जगण्याचे तत्वज्ञान घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाच्या राजकारणाला नवी दिशा देत आहेत. साधू-संतांचे आशीर्वाद व मार्गदर्शन त्यांना लाभत आहे. साधू-संतांच्या शरणागतीत आणि मार्गदर्शनात आपल्या जीवनाचे समाधान, विश्वाचे कल्याण होणार आहे.”

कालिदास महाराज म्हणाले, “काही वर्षांपूर्वीपर्यंत प्रभू श्री राम मंदिराचा मुद्दा वादात होता. तो प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौशल्याने मार्गी लावला. गंगा स्वच्छता अभियान चांगल्या पद्धतीने राबविले जात आहे. आता केंद्र सरकारने गोवंश संरक्षण आणि संवर्धनावर लक्ष्य केंद्रित केले पाहिजे. गोवंश असेल तर देश टिकेल आणि गोवंश असेल तर भारताला वैश्विक महाशक्ती होण्यापासून कोणीच रोखू शकणार नाही. युवा पिढीने सद्सद्विवेक बुद्धीने काम करावे.”

मठाधिपती पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर गुरुवर्य प्रकाशभाऊ शिंदे म्हणाले, “देशभरातून आलेल्या महंतांचे आशीर्वाद घेऊन त्यांच्या पवित्र उपस्थितीत मठाधिपती पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. हा माझा पुनर्जन्म झाल्याची अनुभूती झाली आहे. लवकरच नगर रस्त्यावरील ११ मारुती जागृत मठ उभारणार आहे. अध्यात्मिक ऊर्जेने हा नवा प्रवास जबाबदारीने पुढे नेण्याचा प्रयत्न करणार आहे.”

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!