पुणे: सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन संचालित सूर्यदत्त ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी बारावीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवले आहे. महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे नुकत्याच जाहीर झालेल्या निकालात ‘सूर्यदत्त’ महाविद्यालयाने शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखत यशस्वी घोडदौड केली आहे. महाविद्यालयातील एमसीव्हीसी शाखेचा १०० टक्के, विज्ञान शाखेचा ९७ टक्के, वाणिज्य शाखेचा ९० टक्के तर कला शाखेचा ८८ टक्के निकाल लागला आहे.
विज्ञान शाखेतून तन्मय अनिकेत जहागीरदार (८९.६७ टक्के) प्रथम, इशिता समीर पाटील (८८.१७ टक्के) द्वितीय, तर ऋतुजा प्रताप मगर (८८ टक्के) तृतीय, वाणिज्य शाखेतून वरुण हर्षद जहागीरदार (८९.६७ टक्के) प्रथम, दिलीप सावराम सोळंकी (८५.६७ टक्के) द्वितीय, रिषभ अरविंद चौहान (८४.३३ टक्के) तृतीय, कला शाखेतून गौरी विवेक देशपांडे (८९.८३ टक्के) प्रथम, अमूल्य लक्ष्मण सोनार (८२.६७ टक्के) द्वितीय, निशी संजय मावडीया (८१.६७ टक्के) तृतीय, तर एमसीव्हीसी शाखेतून एलिझाह मेनेजस (६९.६७ टक्के) प्रथम, ओम अमोल शिंदे व जय ऋषिकेश रेळेकर (६७.३३ टक्के) द्वितीय आणि अजय बाळासाहेब नागरे (६४ टक्के) तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत. दिव्या प्रकाश भरेकर हिने विज्ञान शाखेत गणित व संख्याशास्त्रात १०० गुण मिळवले आहेत.
सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया, उपाध्यक्षा सुषमा चोरडिया व प्राचार्या डॉ. किरण राव यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व विद्यार्थ्यासंह अथक परिश्रम घेणाऱ्या स्टाफचे आणि पालकांचे कौतुक केले.
प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया म्हणाले, “कठोर परिश्रम, समर्पण भाव आणि जिद्द तुम्हाला यशस्वी होण्यात महत्वपूर्ण ठरतात. प्रत्येक विद्यार्थ्याने सातत्यपूर्ण मेहनत घेऊन पालक व शिक्षकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. सूर्यदत्त संस्थेने नेहमीच विद्यार्थ्यांना सर्वोत्तम सुविधा, सर्वांगीण विकासाचे ज्ञान आणि मार्गदर्शन देण्यावर भर दिला आहे. योग्य नियोजन, नियमित मार्गदर्शन आणि विद्यार्थ्यांची मेहनत याचा परिपाक म्हणजे बारावीच्या परीक्षेतील हे यश आहे. सूर्यदत्त आगामी काळातही विद्यार्थ्यांच्या करिअरला समृद्ध करत त्यांच्या जीवनमानात उन्नती घडवण्यास कटिबद्ध राहील; तसेच प्रतिभेला वाव देत उच्च शैक्षणिक दर्जा कायम राखेल.”
सुषमा चोरडिया आणि डॉ. किरण राव यांनीही विद्यार्थ्यांच्या या यशाचे कौतुक करीत भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. सहयोगी उपाध्यक्षा स्नेहल नवलखा यांनी विद्यार्थ्यांचे हे यश संस्थेच्या शिरपेचात मनाचा तुरा खोवणारे असल्याचा उल्लेख केला. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना रोख पारितोषिक, मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन लवकरच गौरविण्यात येणार असल्याचे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले.



