भामा आसखेड प्रकल्पग्रस्तांना जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या हस्ते धनादेश वाटप

766

मल्हार न्यूज (ऑनलाईन),

पुणे जिल्ह्यातील भामा आसखेड धरणाकरीता ज्या शेतक-यांच्या जमिनी संपादित झालेल्या आहेत अशा प्रकल्पग्रस्तांना त्यांच्या जमिनीचा मोबदला म्हणून प्रत्येकी हेक्टरी 15 लाख रुपये देण्याचे निश्चित करण्यात आले आहे. त्यासाठी आवश्यक असलेला निधी पुणे महापालिकेने जिल्हाधिका-यांच्या बँक खात्यात जमा केले आहेत. या प्रकल्पग्रस्तांना त्यांच्या जमिनीच्या मोबदल्याच्या रकमेच्या धनादेश वाटपाची प्रक्रिया प्रशासनामार्फत सुरु करण्यात आली आहे. त्याअंतर्गत जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या हस्ते आज धनादेश वाटप करण्यात आले. यावेळी उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन ) भारत वाघमारे व तहसिलदार (पुनर्वसन) सुरेखा दिवटे तसेच प्रकल्पग्रस्त शेतकरी उपस्थित होते.
खेड तालुक्यातील भामा आसखेड धरणासाठी शेतक-यांकडून जमिनी संपादित करण्याचा प्रश्न अनेक वर्षापासून प्रलंबित होता. विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, पुणे महापालिका आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या पाठपुराव्याने हा प्रश्न मार्गी लागला.
याबाबत वेळोवेळी प्रशासनामार्फत पाठपुरावा करण्यात येत होता.
पुणे महापालिकेसाठी पाईप लाईन टाकणे महत्त्वाचे तसेच पाणी टंचाईवर मात करण्यासाठी हे काम पूर्ण होणे आवश्यक होते.
महापालिका आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी नवल किशोर राम तसेच पुनर्वसन विभागाच्या अधिका-यांमार्फत बाधित प्रकल्पग्रस्तांशी सकारात्मक चर्चा करण्यात आली. त्यानुसार त्यांच्या जमिनीचा मोबदला म्हणून प्रति हेक्टर रुपये 15 लाख प्रमाणे मोबदला देण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. पाणी पुरवठ्याशी निगडित हा प्रश्न असल्याने उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) भारत वाघमारे यांनीही दिवसरात्र मेहनत घेऊन उल्लेखनीय काम केले.
त्यानुसार आज एकूण 10 प्रकल्पग्रस्तांना रक्कम रूपये 2.50 कोटीच्या धनादेशाचे वाटप करण्यात आले.
पुनर्वसनाचा खर्च पुणे महापालिकेमार्फत करण्यात येणार आहे. राज्यातील हे एकमेव उदाहरण आहे.