एक होतं पाणी चित्रपटाचा ट्रेलर आणि म्युझिक लॉन्च सोहळा संपन्न

907
मल्हार न्यूज प्रतिनिधी,
 व्ही.पी.वर्ल्ड मुव्हीज, न्यू टॅलेंट सर्च मुव्हीज,प्रस्तुत डॉ.प्रवीण भुजबळ व विजय तिवारी निर्मित आणि रोहन सातघरे दिग्दर्शित ‘एक होतं पाणी’ हा वास्तवदर्शी चित्रपट पांढरपेशी समाजाच्या डोळ्यांत जळजळीत अंजन घालण्यास सज्ज आहे. येत्या १० मे पासून हा चित्रपट महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणार असून पोस्टर डिझाइन्समधून चित्रपटाच्या विषयाचं गांभीर्य आतापर्यंत सर्वांच्या लक्षात आलेलंच आहे. आता लवकरच ‘एक होतं पाणी’ नक्की काय सांगू इच्छित आहे हे कळणार असून या चित्रपटाचा मौलिक संदेश देणारा ट्रेलर प्रशासनाच्या डोळ्यांवरील झापडं उघडेल. अलीकडेच आयोजित करण्यात आलेला ‘एक होतं पाणी’ चित्रपटाचा संगीत अनावरण तसेच ट्रेलर लॉन्च सोहळा अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या अध्यक्षा आणि सुप्रसिद्ध अभिनेत्री वर्ष उसगांवकर यांच्या शुभहस्ते अनेक दिग्गज कलाकार आणि तंत्रज्ञांच्या उपस्थित मोठ्या दिमाखात पार पडला.
याप्रसंगी चित्रपटाचा ट्रेलर पाहून अतिशय भावुक होत वर्ष उसगांवकर यांनी , ”पाणी वाचवणं ही काळाची गरज झाली असून चित्रपटांतून होणारं प्रबोधन हे मोठ्या स्तरावर होत असतं त्यामुळे असे विषय सातत्याने येत राहावेत” असं आपलं मत मांडलं. तसेच निर्माते-दिग्दर्शक आणि लेखकाचे विशेष कौतुक करत चित्रपटाच्या  ह्या संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या आहेत. ‘बोभाटा’, ‘भान राहील’, ‘चला चला’, आणि ‘एक होतं पाणी’ अशी चार गाणी या चित्रपटात असून ही चारही गाणी कथाविषयाला पूरक आहेत. वेगवेगळ्या धाटणीच्या या गाण्यांतून पाण्याचे गांभीर्य सांगण्यात मदत हेते. आशिष निनगुरकर यांच्या लेखणीतून ही चारही गाणी शब्दबद्ध झाली आहेत तर विकास जोशी यांच्या सुरेल संगीताची या गाण्यांना जोड लाभली आहे. शिवाय मराठी मनोरंजन क्षेत्रातल्या नामवंत गायकांनी  ही गाणी गायली आहेत ज्यात आनंदी जोशी, हृषीकेश रानडे, रोहित राऊत, मृण्मयी दडके पाटील आणि विकास जोशी यांचा समावेश आहे.
अनेक चित्रपट महोत्सवांत यशस्वी मोहोर उमटवणाऱ्या  ‘एक होतं पाणी’ ने ‘अंबरनाथ चित्रपट महोत्सवा’मध्ये तब्ब्ल ६ नामांकनं पटकावलेली त्यातील २ पुरस्कारांवर म्हणजेच ‘सर्वोत्कृष्ट कथा-आशिष निनगुरकर’ आणि ‘सर्वोत्कृष्ट बालकलाकार चैत्रा भुजबळ’ या पुरस्कारांवर आपला ठसा उमटवला तर ‘इंडियन वर्ल्ड फिल्म फेस्टिवलमध्ये; ‘विशेष लक्षवेधी परीक्षक पसंती’ या पुरस्काराने या चित्रपटाला गौरवण्यात आले आहे. एक होता राजा.. एक होती राणी आता म्हणू नका ‘एक होतं पाणी’ अशी हटके टॅगलाईन असणारा हा चित्रपट सध्या मराठी चित्रपटसृष्टीत कौतुकाचा विषय ठरत आहे. दुष्काळग्रस्त गावांत टँकरने पाणी उपलब्ध करून देणारी प्रशासकीय योजना कशी केवळ कागदावरच राहिलीये त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे ‘एक होतं पाणी’ हा चित्रपट आहे. ही गोष्ट अशाच एका गावाची आहे ज्यात गावासाठी पाण्याची सोय प्रशासनाने केली आहे. टँकरची नोंदही कागदोपत्री सापडते पण गावात मात्र पाण्याचा एक थेंबही नाही. पाण्याअभावी आतापर्यंत कित्येक गावकऱ्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. हे पाणी नेमकं जातं तरी कुठे… प्रशासनाचा हा अंधाधुंद कारभार कोणाच्याच लक्षात येऊ नये… पाण्यासाठी वणवण करणाऱ्या गावकऱ्यांनी जायचं कुठे-करायचं तरी काय या आणि अशा अनेक प्रश्नांना उत्तर देणार तरी कोण… याचा उहापोह ‘एक होतं पाणी’ करतं. एका ज्वलंत विषयावर प्रकाश टाकत प्रशासनाचे डोळे उघडू पाहणारा हा चित्रपट समाजात जनजागृती निर्माण करेल असा निर्माते-दिग्दर्शकांचा विश्वास आहे.
सामाजिक बांधिलकी जपत आपलं भविष्य आपल्याच हाती आहे हा संदेश ‘एक होतं पाणी’ अधोरेखित करतो. ‘पाणी अडवा पाणी जिरवा’ची सध्या नितांत गरज असून ‘एक होतं पाणी’ म्हणण्याची वेळ येऊ देण्यापूर्वीच त्याविषयी समाजात जागरूकता घडवून आण्यासाठी हा चित्रपट नक्कीच मदतशील ठरेल. या चित्रपटात हंसराज जगताप, उपेंद्र दाते, अनंत जोग,यतीन कार्येकर, जयराज नायर, गणेश मयेकर,दिपज्योती नाईक, रणजित जोग, श्रिया मस्तेकर,बालकलाकार चैत्रा भुजबळ, रणजित कांबळे, त्रिशा पाटील, शीतल कल्हापुरे, शीतल शिंगारे, आनंद वाघ, नाना शिंदे, अनुराधा भावसार, डॉ राजू पाटोदकर, राधाकृष्ण कराळे,वर्षा पाटणकर,कांचन दोडे, यासीर सय्यद,संदीप पाटील आदि कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका पाहायला मिळतील. या चित्रपटाचे छायाचित्रण योगेश अंधारे यांनी केले असून हा चित्रपट १० मे पासून  प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.