येथे पाठीवर थाप पडलीच पाहिजे…

701

अनिल चौधरी, पुणे-

पुणे शहराने अनेक अस्मानी,सुलतानी संकटे पाहिली आहेत.पचविली आहेत.पानशेत प्रलयापासून अनेक छोट्या -मोठ्या संकटांशी पुणेकरांना दोन हात करावे लागले आहेत.लोकसंख्या वाढली;शहराचा विस्तारही वाढला.त्याचबरोबर समस्यांचे स्वरूप व राजकीय समीकरणेही बदलत गेली.अशाही स्थितीत नैसर्गिक संकटात सापडलेल्या नागरिकांना हवी ती मदत मिळवून देण्यात आतापर्यंत जे सहकार्याचे हात पुढे आले;त्यांपैकी कोंढव्यातील पाणीपुरवठा अधिकारी श्री दिलीप लोणकर यांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल.
पाटबंधारे खात्याच्या आडमुठ्या धोरणामुळे ऐन पावसाळ्यात कृत्रिम पाणी टंचाईला तोंड द्यावे लागते आहे.अशा स्थितीत पुण्यात नुकत्याच झालेल्या पावसाने थैमान मांडले.शिवनेरीनगर,कोंढवा व इतर भागात पाणीपुरवठा करणारे पद्मावती येथील पंपिंग स्टेशन पाण्यात गेले होते,मोटर्स नादुरुस्त झाल्या होत्या.या परिसरात पर्यायाने पाणीपुरवठा झालाच नाही.सकाळच्या आंघोळीला सुटी देऊन अनेकांनी कामाचा रस्ता धरला.पिण्यासाठी थोडेसेच पाणी वापरावे लागत होते.दैनंदिन वापराला टिपकाही नव्हता.पंप दुरुस्तीची शाश्वती नसताना कोंढव्यातील पाणीपुरवठा अधिकारी दिलीप लोणकर परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून होते.नागरिकांच्या प्रश्नांच्या सरबत्तीला सहजपणे कृतीतून उत्तर देत होते.अखेर एक पंप दुरुस्त झाला.शुक्रवारी पहाटे पाणीपुरवठा मार्गी लागला.अनेक ठिकाणच्या मागण्यांमुळे त्यावर ताण येत होता.लोणकरांनी परिस्थिती कौशल्याने हाताळली.सर्वांना यथायोग्य सूचना दिल्यानंतर नागरिकांनी योग्य ते सहकार्य केले आणि पाण्याचा जटील प्रश्न श्री. लोणकर यांच्या प्रयत्नातून मार्गी लागला.श्री.लोणकर यांची सामाजिक बांधिलकीची जाण व भान पाहता येथे पाठीवर थाप पडलीच पाहिजे,असे उद्गार न कळत ओठांवर यायलाच हवेत.