Monday, May 12, 2025
Google search engine
Homeपश्चिम-महाराष्ट्रपुणे" कलेची श्रीमंती आज ओक्साबोक्सी रडली..."

” कलेची श्रीमंती आज ओक्साबोक्सी रडली…”

गणेश जाधव,पुणे

आजचा “माझा कट्टा “हा काहीही झाले तरी पाहायचा म्हणून निश्चय केला होता आणि त्याचा अलार्म देखील लावून ठेवला होता…कारण एबीपी माझाच्या कट्ट्यावर येणार होते सुप्रसिद्ध तमाशास्टार “रघुवीर खेडकर” आणि “मंगलाताई बनसोड”…

असा एकही मंचरकर,अवसरीकर,नारायगावकर,जुन्नरकर नाही ज्यांना ही दोन नाव माहिती नसतील.गावातली लोक, जुने जाणकार मंडळी शेतातली काम आवरून संध्याकाळी धावतपळत करत घर गाठायची आणि कशी तरी भाजी भाकरी पोटात कोंबून जिकड ढोलकीचा आवाज येतोय त्या गावाकड सायकलीन किंवा अगदी पायी पायी वाट धरत तमाशाचा फड गाठायची….साधारणतःमार्च ते जून या कालावधी मध्ये तालुक्यातील कोणत्या ना कोणत्या गावात यात्रा आणि जत्रा म्हणजे तमाशा हे अतूट नाते होते.

ज्या जत्रेला रघुवीर खेडकर, मंगलाताई बनसोडे, काळू बाळू, सुरेखा पुणेकर अशी चार पाच पैकी तमाशा ते गाव खऱ्या अर्थाने श्रीमंत असा तर माझा तेव्हा समज झाला होता.पूर्वी दूरदर्शन वगळता एक ही चॅनल नव्हता, मोबाईल अगदी नवखा होता त्यामुळे गावातली वर्षातली तीन दिवस होणारी जत्रा आणि त्यामध्ये होणारे तमाशे हा आख्या तालुक्याचा विरंगुळेचा विषय असे.त्यामुळे कोणत्या गावात, कोणाचा तमाशा याची अगदी हँडबील खिशात घेऊन गावकरी फिरत असत.आपल्या गावात एखाद्या वर्षी तरी रघुवीर खेडकरानंचा तमाशा आणायचाच ही गावातल्या तरुणांची जिद्द असायची यासाठी चढाओढी लागायच्या…

नारायणगाव स्टॅण्डच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत मग त्या अनेक सजलेल्या तमाशाच्या राहुट्यां मध्ये जाऊन तमाशाची बुकिंग व्हायची आणि कोणत्या तमाशाची बुकिंग ग्रामस्थांनी केलेली असावी याची गावाला हुरहरी लागलेली असायची…काही झाले तरी नारायणगावच्या यात्रेत मात्र दहा दिवस तमाशाची रेलचेल असल्याने तिथं एकापेक्षाएक तमाशा पाहण्याची पर्वणी असे म्हणून तिथे तोबा गर्दी ही असायचीच…काही नाही तर निदान छोट्या गावात दोन ते तीन हजार इतका प्रेक्षकवर्ग हा तमाशाला होताच…त्यात मोठे तमाशे असले तर तो दुप्पटीने असे…

गण ,गवळणने तमाशाला सुरुवात होत, लावणी, सिनेमा ची गाणी , बतावणी आणि अखेर वग आणि दुसऱ्या दिवशी सकाळी देखील तमाशाचा काही भाग पुन्हा दाखविला जायचा आणि मग फड तिथून हलवून पुढच्या गावाला जायचा…तमाशा ही मर्यादा सांभाळत होता, त्यात खालच्या दर्जाचे (अश्लील )विनोद फारसे नसायचे, सामजिक संदेश देणारे वग म्हणजे नाटक होते. कालांतराने तमाशाने ही काही बदल अंगीकृत केले आणि तमाशातील प्रेक्षकांची गोडी जणू हळू हळू कमी होऊ लागली,त्यातच शासनाने रात्रभर चालणऱ्या तमशावर बंदी आणली आणि तमाशाचा वेळ कमी केला, नंतर विविध वृत्तवाहिन्या आल्या, इंटरनेट आला, मोबाईल आला आणि तमाशाचा प्रेक्षक अगदी दूर दूर जात राहिला.

मधल्या काळात मी मुंबईतुन गावी मामाकडे यायचो तेव्हा हा तमाशा प्रेक्षकांनापासून खूप लांब गेल्याचे चित्र पाहायला मिळाले. मामाच्या गावी जत्रेला जायचो तेव्हा नेहमी रघुवीर खेडकर आणि मंगलाताई, सुरेखाताई पुणेकर यांचे नाव कानावर पडतअसायचे.कलाविशवातील हीच खरी “श्रीमंत माणस “मला तेव्हा वाटत होती त्याचे कारण म्हणजे तमाशातील कलाकार,नृत्यागना, मंडप ,रंगीबेरंगी रोषणाई आणि त्यांचा भव्यदिव्य लवाजमा इतका की डोळे दिपवून टाकत होता पण हळू हळू जत्रेतील गर्दी ही आता ओसरू लागली. गाव , गावातली माणस नवीन तंत्रज्ञानाने जोडली, जवळ आणली आणि जत्रेतील गर्दी मात्र ओसरू लागली मग तमाशाच्या जागी ऑर्केस्ट्रा संस्कृतीने जन्म घेतला.

तमाशाला पर्याय म्हणून ऑर्केस्ट्रा गावात येऊ लागला तसा तमाशा हळूहळू लोकांच्या स्मृतितुनच जाऊ लागला. नारायणगावच्या एसटी स्टॅण्डवर कधी गेलो की चौकात असलेल्या “विठाबाई नारायणगावकर” यांचा पुतळा नेहमी तमाशाची आठवण करून देत होता. अश्यात आजच्या माझा कट्ट्यावर तेव्हा पाहिलेली कलेतील दोन श्रीमंत माणस आली होती. मात्र कट्टा पुढे पुढे जात होता आणि कलेचे श्रीमंत माणसं मात्र गेल्या काही वर्षात आर्थिक दृष्टीने फकीर होत गेल्याचे चित्र स्पष्ट होत होते ,हे सर्व पाहून मी असह्य होत होतो..

कधी काळी हजारो प्रेक्षकाच्या चेहेऱ्यावर स्मितहास्य आणणारे आज गळ्यात गळे घालून ओकसाबोक्सी रडत होते.मदतीसाठी आर्जव करीत होते…फक्त स्वतःसाठी नाही एकूणच सर्व लोककलावंत आणि तमाशा मधील कलाकरांसाठी मदतीचा पदर पसरत होते.निगरगट्ट व्यवस्थेला धडका देत, नेत्यांचे उंबरे झिजवून देखील हाती काहीच न लागल्याने आज एबीपी माझाच्या माध्यमातून जनतेसमोर आपले गाहऱ्याने मांडत होते.रघुवीर खेडकर यांनी घर चालविण्यासाठी घरातला बंब विकल्याच सांगणे हे तरी काळजाला भिडणारे होते.आधीच डबघाईला आलेला तमाशा कोरोनाने गळा आवळून श्वास कोंडेपर्यंत दाबुन धरलेला वाटला. सरकारने जर आता ही मदत नाही केली तर तो अखेरचा श्वास घेईल.

कदाचित आजच्या जगात तो परत उभा ही राहील ही परंतु अजून किती काळ चालेल हे माहिती नाही. किमान आठ ते दहा हजार कलाकार या कलाविश्वात जोडलेले आहेत ते आज नक्की रडले असतील…आता तरी मायबाप सरकारला जाग येईल का? प्रेक्षकांनी त्यांना आता तरी सन्मानाने जगण्याची संधी द्यावी… त्यांना आदर द्यावा आणि त्यांच्या कलेचा आस्वाद घेताना त्यांना इतर कलाकारांप्रमाणे दर्जा द्यावा हीच माफक अपेक्षा आहे…

त्यावेळी पाहिलेली तमाशा श्रीमंती काहीच वर्षात एवढी भग्न झालेली पाहिल्याने माझं मन अजून ही ते स्वीकार करू पाहत नाही,पण रघुवीरदादा, मंगलाताई हे ही दिवस जातील आणि पुन्हा एकदा नक्कीच सुगीचे दिवस येतील हीच आशा व्यक्त करतो…
फक्त आता रडू नका, लढा…लढत रहा…कारण तुम्ही रडलात म्हणजे कलेची श्रीमंती ऑक्साबोक्सी रडते हे मी पाहिलंय आज माझ्या डोळ्यानी….

(छोटासा प्रयत्न केलाय कलावंतांना समजून घेण्याचा)

...गणेश जाधव (पत्रकार)…

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!