“सावरकर हाजिर हो !” या हिंदी चित्रपटाची घोषणा …

542

पुणे प्रतिनिधी

मोहनदास करमचंद गांधी आणि विनायक दामोदर सावरकर ही दोन्ही नावे एकमेकांशी कायमची जोडली गेली आहेत. सावरकरांचे नाव घेतले की गांधीजींचे नाव आणि गांधीजींचे नाव घेतले की सावरकरांचे नाव घेतले जातेच. एवढा या दोन्ही नावाचा एकमेकांशी अन्योन्य संबंध आहे. गांधी खून खटल्यात सहभागी असल्याचा आरोप झालेल्या युगपुरुष सावरकरांच्या पुढील आयुष्यावर, गांधी नावाच्या महात्माचा झाकोळ कायमस्वरूपी चिकटला आहे आणि आता पुन्हा एकदा ही दोन नावे एकमेकांसमोर उभी ठाकली आहेत. ही दोन्ही एकमेकांपासून वेगळी व्हावीत हे कदाचित नियतीलाही मंजूर नसावे. गांधीजंयतीची दिडशे वर्ष जगभरात साजरी होत असतानाच याच दिवसाला शुभमुहुर्त मानून  सावरकरांवर निर्माण होत असलेल्या “सावरकर हाजिर हो !” या हिंदी चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. ही केवळ चित्रपट रसिकांसाठीच नाही तर गांधी आणि सावरकर यांच्या सर्व अभ्यासकांसाठी, अनुयायींसाठीही महत्त्वाची बाब ठरणार आहे.

लेखक-दिग्दर्शक ज्ञानेश्वर मर्गज यांनी या चित्रपटाचा टिझर आणि पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित करून या हिंदी चित्रपटाची घोषणा केली आहे. या चित्रपटाची निर्मिती आई श्री भगवतीदेवी प्राॅडक्शन्सची असून निर्माता ज्ञानेश्वर मर्गज आहेत. ज्ञानेश्वर मर्गज या चित्रपटाद्वारे हिंदीमध्ये पर्दापण करीत आहेत. याच महिन्याच्या अखेरीस चित्रीकरणास सुरूवात होणार असून या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर करण्यात आली आहे. ३० जानेवारी २०२० ला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत असून या तारखेचे वैशिष्टय म्हणजे याच दिवशी १९४८ ला गांधीजीची हत्या करण्यात आली होती. “सावरकर हाजिर हो !” हा चित्रपट गांधी जयंती दिवशी जाहीर करून भारतभरात या चित्रपटाचे प्रदर्शन गांधी पुण्यतिथी दिवशी होणार आहे. चित्रपटाचा विषय नेमका काय असेल याबद्दल उत्सुकता वाढली आहे. त्याचवेळी या चित्रपटाची स्टारकास्टही गुलदस्त्यात आहे. 

“एक वाडा झपाटलेला” आणि “निवडुंग” या गाजलेल्या मालिकांच्या लेखन-दिग्दर्शनाबरोबरच ज्ञानेश्वर मर्गज यांनी आजवर विविध वृत्तपत्रासाठी स्तंभलेखनही केलं आहे. युनिव्हर्सिटीच्या हिंदी भाषा सुधारित पाठ्यक्रम अभ्यास समितीचे सदस्य असलेले ज्ञानेश्वर मर्गज गेली १७ वषे सातत्याने विविध एकांकिका-नाट्य स्पर्धासाठी परिक्षक म्हणून काम पाहतात. विविध विषयांची अभ्यासपूर्ण हाताळणी आणि तेवढीच प्रभावी मांडणी हे ज्ञानेश्वर मर्गज यांच्या लिखाणाचे वैशिष्ट्य असून २००८ मध्ये त्यांना मिळालेल्या मटा सन्मान पुरस्काराने यावर शिक्कामोर्तब झाले आहे. एकूणच ग्रामीण विकास विषयात उच्च श्रेणी मिळवून पदवीधर झालेला ज्ञानेश्वर मर्गज, ‘सावरकर हाजिर हो !’ द्वारे खळबळ माजविण्यासाठी सिध्द झाला आहे असेच म्हणावे लागेल.