बेजाबदार अधिकाऱ्यावर कारवाईची नागरिकांची मागणी
अनिल चौधरी , नाशिक
नाशिक येथील गोविंदनगर रस्त्यावर वारंवार होत असलेल्या अपघातांची मालिका सुरु असतानांच गुरूवारी (दि.१३) पुन्हा याच परिसरात झालेल्या अपघातात उच्च शिक्षित वकील तरूणी गंभीर जखमी झाली. त्यामुळे गोविंदनगरचा अतिक्रमणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. नाशिक शहर भाजप द्वाराका मंडल अध्यक्ष सुनील देसाई यांच्या कन्या श्रुतिका देसाई या गुरुवारी सकाळी गोविंदनगरकडून सिटी सेंटर मॉलच्या दिशेने जात होत्या. त्यावेळी दुकानांसमोरील गर्दीमुळे अंदाज न आल्याने त्यांचा अपघात झाला. या अपघातात त्यांना चेहऱ्यास, हातास, डोक्यास मार लागला. सुदैवाने कोणतीही मोठी इजा झाली नाही. मात्र त्यांच्या अपघातानंतर स्थानिक नागरिक व रस्त्याने ये जा करणाऱ्या नागरिकांमधून अतिक्रमणप्रकरणी संतापाची लाट उसळली आहे. गोविंदनगरमधील अतिक्रमण पुन्हा कसे थाटले गेले हा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. फेब्रुवारी महिन्यात याच परिसरात शिक्षिकेचा मृत्यू झाल्यानंतर महापालिकेने या परिसरात अतिक्रमण मोहिम हाती घेतली. परंतु, पुन्हा परिस्थिती जैसे थेच दिसून येत आहे. या अतिक्रमण धारकांमुळे पुन्हा एखादा भीषण अपघात व्हायची वाट तर नाशिक महापालिका प्रशासन बघतय का? असा सवाल देखील नागरिक विचारत आहेत ? का चिरीमिरी साठी अतिक्रमण कारवाई होत नाही का असा सवाल देखील नागरिक उपस्थित करत आहेत. वारंवार होणाऱ्या छोट्या मोठ्या अपघातांमुळे नागरिक त्रस्त झाले असून कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून येत आहे , याची दखल प्रशासनाने घेऊन त्वरित रस्ते अतिक्रमण मुक्त करावे अशी मागणी देखील नागरिक करत आहेत.
गोविंद नगरमध्ये नो होकर्स झोन केवळ दिखाव्यासाठी निर्माण केला आहे का, असा सवाल स्थानिक नागरिकांकडून उपस्थित करण्यात आला आहे. अतिक्रमण मुक्त नाशिक करावे ही प्रमुख मागणी आहे. यावेळी माध्यमांशी बोलताना देसाई म्हणाले कि, कोणतीही घटना घडली किंवा प्रश्न विचारला की कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत, असे उत्तर दिले जाते. मात्र प्रशासन सुस्त झाले आहे. निवेदन द्या, आंदोलन करा, काहीही करा, आम्ही काहीही करणार नाही व आम्ही कोणाला घाबरत नाही, अशी स्थिती असून शहरातील सर्व रस्ते अतिक्रमण मुक्त करावेत व रस्त्यांना मोकळा श्वास घेऊ देण्याची मागणी देखील त्यांनी यावेळी केली आहे.



